जागतिक आदिवासी दिनानिमित्त...

आदिवासी म्हटलं की नजरेसमोर येते त्यांची गरिबी, अशिक्षितपणा, अज्ञान वगैरे पण आता परिस्थिती हळूहळू का होईना बदलत चालली आहे. शिक्षक आणि उद्योग या क्षेत्राकडे अधिक प्रमाणात जाताना दिसतोय. संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी देखील शोधत आहेत. मी मूळचा कल्याणचा. पण नोकरीनिमित्त २०१५ पासून पालघरच्या तलासरी भागात स्थित आहे. नोकरीचे पत्र मिळाले आणि त्यावर कामाचे ठिकाण नमूद केले होते. पालघर सोडल्यास माझ्यासाठी बाकी ठिकाण नवीन होते. पत्र मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसला हजर झालो. तिथली सगळी काम आटोपून बाहेर पडलो तर आजूबाजूचा माहोलच वेगळा होता. लोकांचे राहणीमान, बोलीभाषा पाहून असे वाटायचे की आपण इथे फार काळ टिकणार नाही. याआधी मी काही संस्थांच्या सोबतीला शहापूर, वाडा, विक्रमगड या आदिवासी भागात मदत केलेली आहे. पण तिथल्यापेक्षा हा भाग मला जरा वेगळा वाटला. ऑफिसचं काम आटोपून माघारी निघताना रस्त्यावर भली मोठी गर्दी दिसत होती जोरजोरात गाण्यांचा आवाज. जरा जवळ जाऊन पाहिलं तर ती मिरवणूक जागतिक आदिवासी दिनानिमित्त होती. आदिवासींच्या संस्कृतीशी निगडित सगळ्या गोष्टी त्या मिरवणुकीत पाहायला मिळाल्या. आदिवासी समाज जगभर पसरलेला आहे. या समाजात विविध जाती-जमाती, भाषा आणि पेहराव वेगवेगळा आहे.

आदिवासी समाज

एकविसावे शतक म्हणजे तंत्रज्ञानाचे युग. या युगात अजूनही आदिवासी भाग उपेक्षितच आहे. अज्ञान, गरिबी, आरोग्य सुविधा, अन्याय या अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे. या समस्या सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ०९ ऑगस्ट १९९४ रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याची घोषणा केली. १९९४ च्या वर्षात संयुक्त राष्ट्र संघाने पन्नाशी गाठली होती. या संघात एकूण एकशे ब्यान्नव देश सदस्य आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक लढले. ठिकठिकाणी उठावही झाले. हे सारे सुरू असताना आदिवासी बांधवांचेही छोटमोठे उठाव सुरूच होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बिरसा मुंडा यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. बिरसा यांच्या जयंतीनिमित्त २०१९ ला मला जिल्हा परिषद वांगडपाडा शाळेत आमंत्रित करण्यात आले होते. बिरसा यांचे स्वातंत्र्यासाठीचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे म्हणजे उत्तमच. बिरसा मूळचे झारखंडचे. आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून बिरसा यांनी अवघ्या विसाव्या वर्षी इंग्रज सरकार विरुद्ध लढा उभारला. संघटन करून उलगुलानची घोषणा केली. उलगुलान म्हणजे प्रचंड उलथापालथ, हल्लाबोल. शोषणाविरुद्ध, स्वतःच्या हक्कासाठी, खोट्या आरोपांच्या विरुद्ध उलगुलान, उलगुलान, उलगुलान.... अशी ही उद्घोषणा.

आदिवासी साहित्यात मुंडारी बोलीत बिरसा यांच्या पराक्रमाविषयी एक गीत लिहिलेले आहे.

कैसा लियो हिंदुस्थान रे बिरसा

कैसा लियो हिंदुस्थान ।।धृ।।

बिरसा के हाथो में दो दो बंदूक थे ।

बिरसा के हाथो में दो दो तलवार थे ।

कमठे पे चढा दियो तीर नावे बिरसा रे ।

कैसा लियो हिंदुस्थान ।

हे वाचलं की स्फुरण चढते. स्वातंत्र्य चळवळीत लढत असताना पंचविसाव्या वर्षी बिरसा यांना वीरमरण आले. बिरसा गेले पण त्यांचे नाव आजतागायत मुखात आहे. भारतीय सैन्याच्या बिहार रेजिमेंटचा नारा 'बिरसा मुंडा की जय' असा आहे. बिहारमध्ये काही शाळा आणि संस्थांना बिरसा यांचे नाव देण्यात आले आहे. असे हे पराक्रमी बिरसा!

क्रांतिकारक बिरसा मुंडा

आदिवासींचे 'तारपा नृत्य' पारंपरिक आहे. लग्नसमारंभ किंवा इतर सणांच्यावेळी तारपा नृत्याला अधिक महत्व दिले जाते. तारपा वाद्य वाजवल्यावर त्यावर नृत्याचा ठेका घेतात म्हणून ते तारपा नृत्य. तारपाचा आकार गारुडाच्या पुंगीसारखा. तो वाळवलेल्या भोपळ्यापासून तयार करतात. येथे एक समजूत प्रचलित आहे ती अशी, की 'नारनदेवाने' हे वाद्य वारली जनजातीला दिले आहे. तारपा नृत्याची रचना साधारण तारपा वादक मध्यभागी असतो, त्याच्या भवताली स्त्री आणि पुरुष गोल रांगेत उभे असतात. त्या गोलाकार रांगेत उभे असलेले स्त्री-पुरुष एकमेकांच्या कंबरेत हात घालून नृत्य करतात. तारपा वादक जेव्हा संगीताची लय बदलतो तेव्हा नृत्याचीही लय बदलते. तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आरजपाडा येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या तारपा नृत्याची झलक येथे आहे. शाळांना भेटी देत असताना एका शाळेत बाल आनंद मेळावा सुरू होता. तेथे शाळेतले विद्यार्थी तारपा नृत्य करत होते. त्या दरम्यान मला विद्यार्थ्यांसोबत तारपा नृत्य देखील करता आले.

गावातल्या मुली तारपा नृत्य करताना आणि सोबत तारपा नृत्याचे वारली चित्र.

आपण ज्या ठिकाणी असतो तिथल्या बऱ्याचशा गोष्टी शिकण्याच्या मागावर असतो. आदिवासींचे वारली चित्र जगभर प्रसिद्ध आहे. त्या चित्राचे मला विशेष आकर्षण आहे. वारली चित्राचे जनक म्हणून जिवा सोम्या म्हशे प्रसिद्ध आहेत. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात वारली चित्र पोचवण्याचे महत्वपूर्ण काम म्हशे यांनी केले आहे. त्यांच्या गंजाड गावातील अनेक तरुण वारली चित्रांची परंपरा जतन करून ठेवत आहे. या तरुणांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भारत आणि परदेशात भरले गेले आहे. त्यांच्यातलाच एक विजय वाडू याचा लेख ब्लॉगवर आहे. आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित तर आहेच पण आता हळूहळू चित्र बदलताना दिसत आहे. इथल्या मुली नर्सिंगचा कोर्स करून आता घराबाहेर पडत आहेत. विद्यार्थीही विविध कला, खेळ, कौशल्य प्रशिक्षण शिकून गावांचे नाव उज्वल करत आहेत.

विविध वारली चित्रं

आदिवासी भागांमध्ये बऱ्याच संस्था कार्यरत आहेत. बाबा आमटेंनी सुरू केलेलं काम आज त्यांची पिढी जोमाने करत आहे. अनेक नवीन कार्यकर्ते तयार करून सामाजिक सलोखा त्यांनी राखला आहे. जव्हारमधील वयम चळवळ तेथेही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गाव खेडे समृद्ध करून त्यांना स्वावलंबनाच्या मार्गावर आणले आहे. बऱ्याच आदिवासी भागांत अशा सामाजिक संस्था कार्य करत आहेत. पण अजूनही काही ठिकाणी वनहक्कांसाठी, स्वतःच्या घरासाठी, सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. विकास सगळ्यांना हवा आहे पण विकासाच्या वाटेसोबत आदिवासी समाजाकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. पाच वर्षे झाली या भागात शालेय उपक्रम, गाव भेटी यानिमित्ताने फिरतोय. मन अगदी रमलं आहे. इथल्या लोकांच्या बोलीभाषा स्मरण करून त्यांची बोलीभाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये भन्नाट कल्पनाशक्ती आहे. उपक्रमांमधून तर ते दिसतेच. पण एक उदाहरण येथे आवर्जून सांगावेसे वाटते. तलासरी तालुक्याच्या गिरगाव येथील जिल्हा परिषद शाळा आरजपाडा येथील इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्याचे अमोद जोशी 'रीड अ स्टोरी'(इंग्रजी शिकवण्याचा) उपक्रम चालवत आहेत. त्या शाळेतलाच इयत्ता चौथीचा विद्यार्थी केयान दिलीप धोडी याने उत्तम प्रयत्न करून छान इंग्रजी बोलू लागला.  त्यांच्या शाळेत टाईम्स ऑफ इंडियाचा पत्रकार आला होता त्या पत्रकाराने केयानची इंग्रजीत मुलाखत घेतली होती. प्रगतीकडे वाटचाल करणारा आदिवासी समाजाला मदत वगैरे करणं ठीक आहे पण त्यापेक्षा त्यांना उत्तम मार्गदर्शन, योग्य दिशा दाखवणं जास्त गरजेचं आहे.

जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा!!!

- शैलेश दिनकर पाटील

संदर्भ :- आदिवासी साहित्य विविधांगी आयाम - माहेश्वरी गावित

टिप्पण्या

  1. मस्त...तुझ्या निमित्ताने आम्हाला नेहमीच ह्या भागाची शाब्दिक सफर घडते आणि तुझ्या अनुभवावरून ह्या भागातील मूळ प्रश्नांची उकल होते.
    पुढील कार्यास शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. पाटील सर ,सूंदर लिखाण
    आपलं तलासरीतले काम खूप छान,विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण खूप प्रयत्न करीत आहात.ALL THE BEST

    उत्तर द्याहटवा
  3. मित्रा आमच्या समाजाबद्दल तुमची सामजिक ओढ आणि तुमचा अभ्यास खरच या बद्दल तुमचं धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  4. Khup chhan, nakkich yogya margdarshan v disha milali ki samaj utarotar pragati karit rahil👌👌

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"