येथेही आषाढीची यात्रा भरते...
माझे मित्र सुनील यांच्या वडिलांकडून गोविंद महाराज यांच्याविषयी बरंच ऐकून होतो. आणि ते जाणून घेण्याची इच्छा होती. ऐन दिवाळीत गोविंद महाराजांच्या मंदिरात जाण्याचा योग आला. गावातील लोकं म्हणतात की, गोविंद महाराज हे संत तुकारामांचे अवतार होते. त्यांनी देखील अभंग रचले आहे. आणि त्या अभंगात तुकारामांचा उल्लेख आढळतो. गोविंद महाराज यांचा जन्म जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावातला. त्यांचा जन्म १७८५ सालचा. लहानपणापासून विठ्ठलाची भक्ती करणं आणि त्याचा जप करणं हे आवडीने करायचे. शिवाय तुकारामांच्या अभंगाचा प्रभाव त्यांच्यावर पडला असे म्हणायला हरकत नाही.
![]() |
| गोविंद महाराज मंदिर.. |
भक्तीनादात अडकलेल्या गोविंद महाराजांचा विवाह करवून दिला. पण तरीही ते विठ्ठलाच्या भक्तीत लीन होते. असंच एके दिवशी ते जपनाम करत पंढरपूर पायी निघाले. त्यावेळी भाविक भक्त म्हणत की, गोविंद समर्थ पांडुरंग वेडे झालेत. अशा या गोविंद समर्थ महाराजांचे मंदिर पिंपळगाव हरेश्वर येथे आहे.
![]() |
| गोविंद महाराजांची प्रतिमा आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ... |
आषाढी एकादशीवेळी गावात मोठी जत्रा भरते. वेगवेगळ्या गावांतून दिंड्या येतात. भाविकांचं असं सांगणं आहे की, मंदिराच्या जवळून एक नदी वाहते(बहुळा?) त्या नदीकिनारी एक चिंचेचं झाड आहे. त्या झाडाजवळ दरवर्षी प्रथेप्रमाणे दुपारी बारा वाजता आरती होते. आषाढी एकादशीवेळी पंढरपूरचे मंदिर दुपारी बारा वाजता बंद होते त्याला कारण असे की त्यावेळी विठ्ठल खान्देशात येतो. आणि गोविंद महाराजांना दर्शन देतो. अशी धारणा लोकांत आहे.
![]() |
| विठ्ठल ज्या ठिकाणी येतात ती जागा |
मंदिरात गोविंद महाराजांची वंशावळ देखील आहे. त्यांचे वंशज शिवानंद महाराज त्याच गावात राहतात. मंदिराचे नाव जरी गोविंद महाराज असले तरी मंदिरात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती आहे आणि मंदिराच्या सभामंडपात गोविंद महाराजांची प्रतिमा आहे त्या प्रतिमेजवळ त्यांनी लिहिलेली अभंगाची प्रत असल्याचे सांगितले जाते. शिवाय त्यांचे निवडक अभंग देखील भिंतीवर लिहिलेले आहेत.
गोविंद महाराजांचे साहित्य म्हटलं तर त्यांनी दोनशे अठरा अभंग लिहिलेले आहेत तर एक हिंदी पद लिहिलं आहे. शिवाय विठ्ठलावर एक आरतीही त्यांनी रचलेली आहे. गोविंद महाराज एका अभंगात म्हणतात...
अभंग करावे बहुत |माझी थोडकी बिशांत ||
अवघा आहे माझा नेम |दोनशे अभंगाचे काम ||
त्यांचच एक हिंदी पद आहे..
सद्गुरू रंगेला रंगेला |पिलाया सो हं भंगका पेला ||
पूर्व हमारा संचित आया |पकरी संतनकी कास |
संत संगिने घर बतलाया |जावे सद्गुरू के पास ||
त्यांचे दोनशे अठरा अभंग, सहा हिंदी पदं वं तीन दोहे? अशा एकूण दोनशे सत्तावीस रचनांचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे ज्याला 'श्री गोविंद महाराज संस्थान, उत्राण यांची अभंग-वाणी' असे नाव दिले आहे.
![]() |
| गावातून दिसणारे मंदिर.. |
गोविंद महाराजांची समाधी पिंपळगावातच आहे. इथल्या गावातील बहुतांश लोकांच्या घरात गोविंद महाराजांची प्रतिमा आहे व अनेक दुकानांना गोविंद महाराजांची नावं दिलेली आढळतात.
- शैलेश दिनकर पाटील




छान माहिती दादा, अगदी कमी शब्दात संपूर्ण पिंपळगाव सामावून घेतलय बघ....😍🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद...
हटवा