अशेरीगड...
मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असलेले पालघर जिल्ह्यातील खडकोना गाव. याच गावातून अशेरीगडावर जाण्यासाठी मार्ग आहे. हा गड चढाईला अगदी मध्यम स्वरूपाचा आहे. इतर गडांवर जशी गर्दी असते तशीच गर्दी सुट्टीच्या दिवशी येथे असते.
गडाच्या दिशेने जाताना काही ठिकाणी मार्गीका दाखवल्या आहेत. त्या मार्गीकेचा वापर केल्यावर दिशा चुकण्याची शक्यता कमी असते. गडाची पायवाट घनदाट जंगलात आहे. वाटेत काही चौथरे लागतात ते कसले आहेत याबाबत काही कल्पना नाही.
घनदाट जंगलाची वाट पार केल्यावर वाघोबा देवाचे स्थान लागते. त्याचे दर्शन घेऊन पुढे गेल्यास कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्या वाटेने अगदी सांभाळून पुढे जावे लागते. गडाच्या टोकावर जाण्यासाठी आपल्याला एक लोखंडी जीना लागतो त्या जिन्यावरून आपल्याला माथ्यावर पोचता येते.
माथ्यावर पोचल्यावर आपल्याला एका दगडावर उठावदार असे मुकुट आणि पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह दिसते. या चिन्हावरून येथे पोर्तुगीतांचे वास्तव्य असल्याचे समजते. गडावर पाण्याचे टाके आहेत त्यातील एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. तेथील पाणी ट्रेकर्स मंडळीची तहान भागवते.
बालेकिल्ल्याकडे गेल्यावर आपल्याला काही भंगलेल्या वास्तू दिसतात. तेथून पुढे गेल्यावर अशेरी? देवीचे मंदिर आहे. तेथे काही तोफा पहायला मिळतात. शिवशंभु प्रतिष्ठान नामक संस्थेने तेथे तोफगाड्याचे काम करायला घेतले आहे गडावर तोफा शोधून त्याचं जतन करण्याचं काम या संस्था करत आहेत.
हा गड आठशे वर्ष जुना व शिलाहारवंशिय राजाने बांधल्याचे सांगितले जाते. १४ व्या शतकात राजा बिंबदेवने हा गड जिंकला. पुढे पोर्तुगीजानी वसई जिंकल्यावर अशेरी देखील ताब्यात घेतला. किल्ल्याचे महत्व समजून त्यांनी तेथील बांधकाम मजबूत केले. छत्रपती संभाजी राजांनी तारापूरवर हल्ला केल्यावर त्यांनी अशेरीगड जिंकून घेतला. पुढे परत काही वर्षांनी पोर्तुगीजांनी तो ताब्यात घेतला. चिमाजी अप्पांनी वसईची मोहीम आखताना अशेरी ताब्यात घेतला. १८१८ नंतर अशेरी इंग्रजाच्या ताब्यात गेला.
अशेरीगडावरील भंगलेल्या वास्तू पाहिल्यावर तसेच आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर हा गड इतिहासाच्या अनेक साक्षी सांगतो.
- शैलेश दिनकर पाटील







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा